shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

सुरत ते दक्षिणेतील राज्ये व पुणे ते छत्रपती संभाजीनगर हे नवीन रस्ते महाराष्ट्राचे भविष्य बदलणारे ठरतील - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी


अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
सुरत ते दक्षिणेतील राज्याला जोडणारा ८० हजार कोटी रुपयांचा नवीन रस्ता व पुणे ते छत्रपती संभाजीनगर रस्ता महाराष्ट्राचे भविष्य बदलणारे रस्ते ठरतील, असा विश्वास केंद्रीय रस्ते, वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.


 शहरातील द्वारका लॉन्स येथे ९६१ कोटी रुपये किंमतीच्या अहमदनगर शहर बाह्यवळण रस्ता, ९८० कोटी रुपये किंमतीच्या अहमदनगर- मिरजगांव-करमाळा-टेंभुर्णी  पॅकेज (एक) अहमदनगर ते घोगरगांव, व पॅकेज (दोन) घोगरगांव ते चापडगांव  १०३२  कोटी रुपये किंमतीच्या रस्त्यांचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार मोनिका राजळे,आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, माजी आमदार चंद्रशेखर कदम, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, नॅशनल हायवेचे संजय जयस्वाल संतोष शेलार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

*अहमदनगरच्या विकासाला चालना

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, सुरत ते दक्षिण भागाला जोडणारा नवीन रस्ता तयार करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील पाच जिल्ह्यातुन हा रस्ता जात असुन त्याची लांबी ४८२ किलोमीटर एवढी आहे. अहमदनगर जिल्ह्यातुन १४१ किलोमीटर हा रस्ता जात आहे. त्यासाठी १०९५ हेक्टर जमीन संपादित करण्यात येत आहे. तसेच पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा रस्ताही नव्याने तयार करण्यात येत असुन या रस्त्यामुळे केवळ दोन तासांमध्ये छत्रपती संभाजीनगरला पोहोचता येणार आहे.  या दोनही रस्त्यांमुळे अहमदनगरच्या विकासाला अधिक चालना मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  

जिल्ह्यात ८६९ किलोमीटरचे नॅशनल हायवेचे जाळे
उद्योग आणि व्यापार क्षेत्राच्या विकासासाठी उत्तम रस्ते, दळणवळणाची साधने, वीज व पाणी बाबींची आवश्यकता असते. पूर्वीच्या काळात जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची लांबी केवळ २०२ किलोमीटर एवढीच होती. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातुन गेल्या दहा वर्षात जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे वाढविण्यावर भर देत नव्याने ८६९ किलोमीटर लांबी वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यात १२ हजार कोटी रुपयांची २१ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी  ११ कामे पुर्ण करण्यात आली असुन ९ कामे प्रगतीपथावर आहे. येणाऱ्या काळात ही कामे जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय वाढीस लागण्यास अतिशय उपयुक्त ठरतील, असा विश्वासही केंद्रीय मंत्री श्री गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

*जिल्ह्यात नवीन १४२० कोटी
रुपयांच्या रस्त्यांना मान्यता

अहमदनगर जिल्ह्याचा चौफेर विकास करण्यावर भर देण्यात येत आहे. ४०० कोटी रुपये किंमतीचा माळशेज घाट, आणेघाट, अहमदनगर बायपास, खरवंडी कासार जंक्शन सिमेंट काँक्रीटीकरण, ६७० कोटी रुपयांच्या अहमदनगर ते सबलखेड, आष्टी व चिंचपूर तसेच ३५० कोटी रुपयांचा नांदूर शिंगोटे ते कोल्हार या नवीन रस्त्यांच्या कामांना दिली असल्याचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केली.

ग्रीन हायड्रोजन निर्मितीसाठी साखर कारखानदारांनी पुढाकार घ्यावा

ग्रीन हायड्रोजन हीच भविष्यातील टेक्नॉलॉजी आहे. बायोमास्कपासुन मिथेन व मिथेनपासुन हायड्रोजन तयार करण्यात येणार आहे. या हायड्रोजनवर विविध कारखाने, केमिकल इंडस्ट्री, रेल्वे, ट्रक, बसेस तसेच विमानेसुद्धा या हाड्रोजनवर चालणार आहेत. त्यामुळे साखर कारखानदारांनी ग्रीन हायड्रोजन निर्मितीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर 
9561174111
close