बीड प्रतिनिधी:
अधिस्विकृती पत्रिका धारक पत्रकारांना बंद करण्यात आलेली रेल्वे प्रवासाची सवलत पुन्हा सुरु करण्याची मागणी बहुभाषिक साप्ताहिक संपादक, पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना देण्यात आले आहे. ते बीड येथे बीड जिल्हयातील रेल्वे कामाच्या आढावा बैठकीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांची भेट घेवून सदरील निवेदन देण्यात आले. यावेळी बहुभाषिक साप्ताहिक संपादक, पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष शेख ताहेर, प्रदेशाउपाध्यक्ष सुनिल पोपळे, राज्य प्रसिध्दी प्रमुख शेख अब्दुल रहेमान, मराठवाडा उपाध्यक्ष नितेश उपाध्ये आदींची उपस्थिती होती.
भारतीय रेल्वे विभागाकडून पत्रकारांना रेल्वे प्रवासात तिकिटामध्ये ५० टक्के सवलत दिली जात होती. देशभरातील राज्य शासनाने अधिस्विकृती पत्रिका दिलेले पत्रकार या योजनेसाठी पात्र होते. प्रवासात सवलत असल्या ने वार्ता संकलनासाठी, विविध राजकीय कार्यक्रमासाठी जाण्यासाठी सवलतीचा मोठा फायदा पत्रकारांना होत होता. राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रसिद्धी देण्यासाठी, विविध योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे सोयीचे होते, असे निवेदनात म्हंटले आहे.
सन २०२० पासून रेल्वे विभागाने पत्रकारांची ही सवलत बंद केली आहे. त्यामुळे देशभरातील पत्रकारांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रवासात सवलत नसल्याने अनेक पत्रकार प्रवास करत नाहीत परिणामी सरकारी योजना, शासकीय कार्यक्रमाला जाण्यास अडचणी येत आहेत. सर्व बाबींचा विचार करून देशभरातील राज्य शासनाने अधिस्विकृती पत्रिका दिलेल्या पत्रकारांना पूर्वीप्रमाणे रेल्वे प्रवासात सवलत देण्याची मागणी बहुभाषिक साप्ताहिक संपादक, पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या निवेदनावर संपादक विलास डोळसे, अविनाश वाघिरकर, प्रचंड सोळंके, लक्ष्मण गायकवाड, आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111