सहजच बघितलं तर नक्कीच वाटेल की किती सहज आणि सुंदर ओळी ह्या. धर्माचे अत्यंत स्तुत्य सत्य तत्व साने गुरुजींच्या विचाराने मांडलेत. खरं तर कोणत्याही धर्माचा स्वीकार प्रेमाशिवाय होऊच शकत नाहीत. प्रेम म्हणजे धर्म व धर्मशास्त्र, व धर्म म्हणजेच प्रेम..
हे देवत्व एक सुगंधी फुल कोकणातील पालगड या अगदी छोट्याशा खेड्यात यशोदा बाईच्या पोटी २४ डिसेंबर १८९९ रोजी संपुर्ण महाराष्ट्रासाठी "श्याम" चाच जन्म झाला. अर्थात आदर्शवादी क्रांतिकारक पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच महाराष्ट्राला परिचित साने गुरुजी अर्थात " श्याम"..
आपल्या आई यशोदा मातेच्या संस्कारात वाढलेल्या साने गुरुजीं म्हणतात की, " आई माझ्या गुरु ,आई कल्पतरू"
" एक आई शंभर शिक्षकांपेक्षां ही श्रेष्ठ आहे"
लहानपणी आईने एकदा म्हटले होते की, " अरे श्याम! पायांना घाण लागू नये म्हणून तु जपतोय तसे आपल्या मनाला घाण लागू नयेत म्हणून जप बरं".
लहानपणापासून चांगल्या मानवतावादी संस्कारांची शिदोरी घेऊन ते पुण्यातील न्यु पुना कॉलेजमध्ये १९२४ साली एम ए फिलोसॉफी होउन अंमळनेर येथे अध्यापनाचे काम सुरू असतानाच भारतीय स्वातंत्र्य चळवळीतही हिरीरीने सहभागी होउन नाशिक च्या जेल मध्ये ही गेले व जेलमध्ये असताना बरेच ग्रंथ संपदा लिखाण केले त्यामध्येच" श्याम ची आई " अतिशय सुंदर पुस्तक प्रकाशित करून नंतर त्यावर प्र.के. अत्रें नी त्यावर चित्रपट काढला.त्याला राष्ट्रपती पदक ही मिळालं.
साने गुरुजींची एका वाक्यात ओळख सांगायची असेल तर " 'मानवतावादाचे सर्वश्रेष्ठ मराठी प्रवक्ते'" असे म्हणता येईल. ते अमळनेरला गेले होते तत्त्वज्ञान शिकण्यासाठी, शिक्षक होण्यासाठी नव्हे! मात्र तत्त्वज्ञानाचा उपयोग अंतिमतः मानवी जीवन सुखी व समाधानी होण्यासाठी केला पाहिजे, असा साक्षात्कार त्यांना झाला. आणि मग ते मानवी संस्कृतीच्या वाटचालीचा शोध घेऊ लागले. त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांनी ‘भारतीय संस्कृती’, ‘चिनी संस्कृती’ व ‘इस्लामी संस्कृती’ ही तीन पुस्तके लिहिली. यातील पहिले पुस्तक त्यांच्या हयातीत प्रकाशित झाले, दुसरे पुस्तक कधीच प्रकाशित होऊ शकले नाही, तिसरे पुस्तक त्यांच्या मृत्युनंतर प्रकाशित झाले.
ही तीन पुस्तके लिहिताना, गुरूजींच्या मनात भारतीय, इस्लामी व चिनी या तिन्ही संस्कृती आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि आपल्या देशबांधवांना समजावून दिल्या पाहिजेत हा विचार प्रबळ झालेला असणार. किंबहुना त्यांचा मानवतावादी विचार बळकट होण्यासाठी आणि 'खरा तो एकचि धर्म' ही अजरामर प्रार्थना त्यांच्या लेखणीतून बाहेर येण्यासाठी वरील तिन्ही पुस्तकांच्या काळातील अभ्यास व चिंतन उपयुक्त ठरले असणार. अशा पार्श्वभूमीवर " इस्लामी संस्कृती " या छोट्या व अपूर्ण, पण विशेष महत्त्वाच्या पुस्तकाकडे पाहायला हवे. " इस्लामी संस्कृतीचा उगम, विकास व विस्तार कसा झाला याविषयीचे कुतुहल हे पुस्तक काही प्रमाणात शमवते आणि बऱ्याच जास्त प्रमाणात वाढवते. कोणत्याही उत्तम पुस्तकाचे हे प्रमुख लक्षण असते. असो.
माझी मुलगी डॉ आहेत (बी. डी.एस ) हिचं लग्न समारंभ १९ डिसेंबर २०२२ ला श्रीरामपूरात स्वागत मंगल कार्यालयात लग्न समारंभात साने गुरुजींच्या " इस्लामी संस्कृती" चे पुस्तक समारंभात येणाऱ्या पाहुण्यांना भेट म्हणून दिले होते..
आदरनिय व्यक्तीमत्व मान.श्री .साने गुरुजी ११ जुन १९५० या दिवशी निधन पावले...
अशा मानवतावादी विचारांच्यां महात्म्याच्या आजच्या स्मृति दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
शब्दांकन
डॉ.सलीम सिकंदर शेख
बैतुशशिफा हॉस्पिटल, श्रीरामपूर