बेलापूर - श्रीरामपूर तसेच बेलापूरच्या पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावांनी तळ गाठल्याने नजिकच्या काळात पिण्याचे पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. सदर बाब महसूल तथा पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांचे निदर्शनास आणल्यावर त्यांनी याची तातडीने दखल घेत भंडारदरा धरणातून पिण्याचे पाण्याचे आवर्तन घेण्याचे आदेश दिल्यावर धरणातून पाणी सोडण्यात आल्याची माहिती जि.प.सदस्य शरद नवले यांनी दिली.
श्री.नवले यांनी सांगीतले की, आपण स्वतः नाम.विखे यांची भेट घेतली.तसेच बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे ,सरपंच स्वाती अमोलिक,उपसरपंच मुश्ताक शेख यांनी पालकमंञ्यांना पञाव्दारे पिण्याचे पाण्याच्या समस्येबाबत परिस्थितीबाबत अवगत केले. साठवण तलावात जेमतेम पाणी असून आठ दिवसांत पिण्याचे पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे हे निदर्शनास आणून दिले.
सदर परिस्थिती बघता भंडारदरा धरणातून पिण्याचे पाण्यासाठी पाणी सोडावे आशी मागणी करण्यात आली.याची त्वरित दखल घेवून पालकमंञी नाम.विखे यांनी भंडारदरा धरणातून पिण्याचे पाण्याचे आवर्तन घेणेचे आदेश दिले.त्यानुसार धरणातून १४०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले असून यामुळे श्रीरामपूर व बेलापूरच्या नागरिकांना दिलासा मिळाला असल्याचे श्री.नवले म्हणाले.