लोकसेवा विकास आघाडीच्यावतीने उप विभागीय (प्रांत) अधिकारी यांना निवेदन
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
दूधाला किमान ३५ रुपये भाव मिळावा या मागणी साठी राज्यभर दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. वर्षभर सातत्याने तोटा सहन करावा लागल्याने दूध उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शासनाने दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य कराव्यात याकरिता माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने उपविभागीय (प्रांत) अधिकारी किरण सावंत पाटील यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात असे म्हटले आहे की, सध्या दूधाचे भाव अत्यंत कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. सरकी पेंड, जनावरांचा चारा, जनावरांचा दवाखाना आदींचे भाव गगनाला भिडलेले असताना त्याप्रमाणात दूधाला योग्य तो दर मिळत नाही व उत्पादन खर्चही सुटत नाही. सदर मागणीचा शासन स्तरावर विचार होणे आवश्यक आहे. निवेदनाचा गांभीर्यपूर्वक विचार होऊन शासनाने दूधाला प्रती लिटर किमान रु. ४० हमीभाव जाहीर करुन त्याप्रमाणे अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे. निवेदनाचे अनुषंगाने शासन स्तरावर तातडीने कार्यवाही व्हावी, तसे न झाल्यास याप्रश्नी सोमवार दि.८ जुलै २०२४ रोजी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने वांगी खुर्दचे उपसरपंच सचिन भगत राऊत यांचेसह दूध उत्पादक शेतकरी महात्मा गांधी पुतळा, श्रीरामपूर येथे आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदन देताना वांगी खुर्दचे सचिन राऊत, गणेश छल्लारे, शनैश्वर पवार, विष्णुदास जगताप, बाळासाहेब पवार, अशोक कोळेकर, अनिल कोपनर, पोपट ढेकळे, रोहित गायकवाड, नवनाथ कोपनर, अमोल राऊत, सोमनाथ विटनोर, बाळासाहेब कांदळकर, ज्ञानेश्वर गायकवाड, गणेश दरंदले, भिमराज बर्डे, कैलास मेकडे, राहुल पवार, राजेंद्र लाटे, सर्जेराव गायकवाड, अशोक येळे, अशोक मेकडे आदी उपस्थित होते.
*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111